ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या ‘या’ गावात डेंग्यूचा उद्रेक
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांच्या माध्यमातून विविध आश्वावसानांचा पाऊस पडताना सामान्य नागरिकांना पाहिला. एवढ्यावरच न थांबता केलेल्या कामांची यादी सुद्धा उमेदवारानी जाहीर केली. एकीकडे देशभरात लोकशाहीचा जयजयकार सुरू होता तर, दुसरीकडे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि दगडांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावात डेंग्युने आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रनेने स्वच्छ भारत, सुंदर भारत या घोषवाक्याला हरताळ फासण्याचे काम केल्याची चर्चा सध्या चंद्रपूर जिल्ह्यात रंगली आहे.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील किरमिरी या गावामध्ये धक्कादायक प्रकार घडत असल्याचे उघड झाले आहे. 500 कुटुंब आणि 1 हजार 300 च्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या या गावामध्ये मागील दहा वर्षांपासून नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहतंय. अनेक ठिकाणी डबकी तयार झाली आहेत. तसेच कचऱ्याच्या विल्हेवाटाची सुद्धा सोय करण्यात आलेली नाही. दुर्गंधीमुळे गावात डेंग्यूची साथ पसरली आहे. शासकीय आकडेवारीनुसार गावात दोन डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे आठ ते दहा रुग्णांनी खासगी रुग्णालयाच उपचार केले असून त्यांची नोंद शासकीय आकडेवारीमध्ये करण्यात आलेली नाही. डेंग्यूचे दहा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र ग्रामपंचायतीने याचे खापर आरोग्य विभाग आणि गावकऱ्यांवर फोडले. त्यामुळे शासकीय उपक्रम केवळ जाहिरात आणि नारेबाजीपुरते मर्यादित असल्याचे उघडकीस आले.
डेंग्यूने डोकेवर काढल्यानंतर गावामध्ये विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. त्यामुळे आता डेंग्यूची साथ आटोक्यात आली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे घाण अजूनही तशीच आहे. गावातील काही भिंतींवर स्वच्छतेचे संदेश लिहण्यात आले आहेत. असे असले तरी स्वच्छता राखण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे. गावातील अस्वच्छतेमुळे दाहा लोकांचा जीव टांगणीला लागला होता. तरीसुद्धा ग्रामपंचायतीने झोपेचे सोंग सुरूच ठेवले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List