हेच नेते राहुल गांधी यांच्या पुढेमागे करायचे; पक्ष सोडून BJP मध्ये गेलेल्या नेत्यांचा खरगे यांनी घेतला समाचार
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची चांगलीच खरडपट्टी केली. ”हे तिच लोक आहेत ज्यांनी काँग्रेसच्या विचारधारा अंगीकारल्या नाहीत, हे लोक कधीकाळी मंत्रीपद मिळावे आणि राजकारणात ओळख मिळावी यासाठी राहुल गांधी यांच्या पुढेमागे करायचे. राहुल गांधी यांनी या लोकांना मंत्रीपद दिले, राजकारणात ओळख मिळवून दिली आणि आता अचानक त्यांना राम मंदिर आठवले, असे म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचा समाचार घेतला.
खरगे यांनी एनडीटिव्हीला मुलाखती दिली. भाजपमध्ये गेलेले नेते कधी काँग्रेसच्या विचारधारा अंगीकारू शकले नाहीत. त्यासाठीच त्यांनी मार्ग बदलला होता. आज तेच लोक भाजपमध्ये आहेत. त्यांचे स्वत:चे असे काय अस्तित्व आहे? घाबरले म्हणून ते भाजपमध्ये गेले, असे खरगे म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीवरही खरगे बोलले. या निवडणुकीत आमची कामगिरी चांगली असणार आहे आणि भाजप कमकुवत होईल. भाजपने आता वरची पातळी गाठली असून आता त्यांना खाली यावे लागणार आहे, असे ते म्हणाले. ‘राजस्थानमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली. आता आम्ही मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही चांगली कामगिरी करू. गेल्या वेळी महाराष्ट्रात फक्त एक जागा जिंकता आली होती. मात्र यावेळी महाविकास आघाडीची कामगिरी चांगली आहे. किमान 30 जागा जिंकू, असे आम्हाला वाटते. भाजपची संख्या कमी होत आहे. त्यांनी शिखर गाठले आहे. आता आपण त्यापलीकडे जाऊ शकत नाही. पण आम्ही जिथून हरलो होतो तिथून पुढे जात आहोत, असे खरगे यांनी सांगितले.
निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी बाजू बदलली यावरही खरगे यांनी उत्तर दिले. अशाप्रकारचे लोक कधी ना कधी असेच करतात. नितीशकुमार यांनीच लोकांना आपल्या घरी बोलावून आघाडीबाबत चर्चा केली होती, असे खरगे म्हणाले. यानंतर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार त्यात बदल केला. आम्हाला कसलीही चिंता नाही. जे विचारधारेशी बांधील आहेत ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. शिवाय जिंकल्यानंतर ते लोक निघून गेले असते तर आणखी वाईट झाले असते, असे ते पुढे म्हणाले. महाविकास आघाडी जिंकल्यानंतर गेलेले नेते परत आले तर त्यांना पक्षात स्थान मिळेल का? त्यावरही खरेंनी उत्तर दिले. असे लोक टिकत नाहीत. आता या वाटेने कधीही येणार नसल्याची शपथ त्यांनी घेतली आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List