पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा; अतुल लोंढे यांची मागणी
पुण्यातील कल्याणीनगर येथे एका बिल्डरपुत्राने बेदरकार गाडी चालवत दोघांना गाडीखाली चिरडल्याची घटना पुण्यात घडली होती. हे गंभीर प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. दारुच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवत दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पोलीस ठाण्यात बडदास्त राखण्यात आली. गुन्हा दाखल करताना किरकोळ कलमे लावून तातडीने रात्रीच न्यायालयात हजर करुन जामीन मिळवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असून अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
अतुल लोंढे म्हणाले की, पुणे अपघातातील आरोपी हा बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत आहे. त्याने बेदरकारपणे भरधाव गाडी चालवत दोघांना चिरडले. वेदांत हा दारुच्या नशेत वाहन चालवत होता. तसेच त्याच्या पोर्शे या कारला नंबरप्लेटही नव्हती. बेदरकारपणे कार चालवून दोघांना चिरडलेल्या वेदांत अग्रवालला पोलिसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यात त्याच्यासाठी पिझ्झा, बर्गर मागवल्याचेही माहिती मिळाली आहे. एवढे गंभीर प्रकरण असताना पोलिसांनी तातडीने थातूर मातूर कलमे लावून लगेच न्यायालयात हजर केले. पोलिसांनी वेदांतला वाचवण्यासासाठी एवढी तत्परता का दाखवली? पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव होता का? याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. ज्या पोली अधिकाऱ्यांनी हे प्रकरण हाताळले त्या सर्वांना निलंबित करुन कठोर कारवाई केली पाहिजे. हीच तत्परता व विशेष वागणूक इतर नागरिकांना मिळते का ? असा संतप्त सवाल करत कायदा सर्वांना समान असतो याचे भानही पोलिसांना राहिलेले नाही, असेही लोंढे म्हणाले.
पुणे अपघातप्रकरणी पोलीस कारवाईवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जाग आली आणि त्यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले. हे म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ असा प्रकार आहे. वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्याचे कारनामे पाहता त्याच्या वयाकडे पाहण्याची गरज वाटत नाही, त्याने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर आहे. त्याने दोन जणांचा जीव घेतला असताना पोलिसांना त्याचे काहीच कसे वाटले नाही? अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना धमक्या देण्यात आल्याचे पुणे पोलीस आयुक्त आता सांगत आहेत. असे असताना पोलीस काय झोपा काढत आहेत का? महाभ्रष्टयुती सरकारच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. पुणे शहराचा सांस्कृतिक व शैक्षणिक नगरी असा लौकिक आहे. पण त्याला काळिमा फासण्याचे काम या महायुती सरकारने केले आहे, असा आरोपही अतुल लोंढे यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List