उन्हाचा तडाखा, संथ मतदान प्रक्रिया, ईव्हीएम बिघाड..तरीही टक्का वाढला
उन्हाचा तडाखा सोसत ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघरमधील मतदान केंद्रांवर पोहोचलेल्या मतदारांना ईव्हीएममधील बिघाड तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी संथ गतीने केलेल्या मतदान प्रक्रियेचा फटका बसला. परंतु मतदारांनी माघार न घेता लोकशाहीचा हक्क बजावल्याने भिवंडी ५६.४१ तर कल्याण लोकसभेत सरासरी ४६.१० टक्के इतके मतदान झाले. ठाण्यात ४९.८१ तर पालघरमध्ये ६१.१८ इतके टक्के मतदान झाले. भिवंडीत मागील निवडणुकीत ५३.५८ इतके मतदान झाले होते ते आज तीन टक्क्यांनी वाढले.
कल्याणमध्ये गेल्या निवडणुकीत ४४.२७ इतके मतदान झाले होते. ती आकडेवारी दोन टक्क्यांनी वाढली. ठाण्यात मागील निवडणुकीत ४९.९५ इतके मतदान झाले होते. या निवडणुकीत टक्केवारीत फारसा बदल झाला नाही. पालघर लोकसभेत मात्र २०१९ मध्ये ६४.०९ इतके मतदान झाले होते. मात्र आज झालेल्या निवडणुकीत मतदानाची आकडेवारी तीन टक्क्यांनी घसरली. असे असले तरी ही आकडेवारी सरासरी असल्याने अंतिम आकडेवारीत हा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
रणरणत्या उन्हाचे चटके बसत असतानाही लाखो मतदारांनी मतदान केंद्रांवर जाऊन शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मतदानाचे कर्तव्य बजावले. मात्र निवडणूक आयोगाच्या सावळागोंधळ कारभाराचा मोठा फटका त्यांना बसला. सकाळी सात ते नऊदरम्यान ठाण्यात ५.६७, कल्याणमध्ये ५.३९, भिवंडी ४.८६ आणि पालघरमध्ये ७.९५ टक्के इतके मतदान झाले. उन्हाच्या तडाख्यांमुळे मतदानाचा टक्का थोडा रेंगाळला. नंतर मतदानासाठी आलेल्या मतदारांना ईव्हीएम बिघाड आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या संथ कारभाराचा फटका बसला. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागून गोंधळ उडाला. पर्यायाने तास-दीड तासाचा खोळंबा झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List