लोकलच्या गर्दीत धक्का लागून मृत्यू हा अपघातच! रेल्वे मंत्रालयाला हायकोर्टाचा दणका
लोकल ट्रेनच्या गर्दीत धक्का लागून खाली कोसळलेल्या प्रवाशाचा मृत्यू होणे हा अपघातच आहे. रेल्वे प्रशासन अशा घटनांमध्ये भरपाईचा दावा नाकारू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला दणका दिला. 25 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना चार लाखांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
न्यायमूर्ती किशोर संत यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी विवेक शहा हा लोकलने गोरेगाव ते कांदिवली प्रवास करीत होता. लोकलच्या फुटबोर्डवर उभा असताना गर्दीत धक्का लागला आणि तो खाली कोसळला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 8 एप्रिल 1999 रोजी ही घटना घडली होती. विवेकच्या पालकांनी भरपाईसाठी केलेला दावा रेल्वे दावे न्यायाधिकरणाने फेटाळला होता. त्या निर्णयाला आव्हान देत विवेकचे वडील हेमेंद्र शाह यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तब्बल 20 वर्षे त्यांचे अपील प्रलंबित होते. अखेर न्यायमूर्ती संत यांच्या एकलपीठाने अपिलाचा स्वीकार केला आणि रेल्वे मंत्रालयाला दणका दिला. न्यायालयाने चार लाखांची भरपाई मंजूर केल्यामुळे विवेकच्या कुटुंबीयांना 25 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे.
तीन महिन्यांत भरपाई द्या!
विवेकच्या पालकांना भरपाईसाठी अर्ज केल्याच्या तारखेपासून वार्षिक सहा टक्के व्याजासह चार लाख रुपयांची भरपाई पुढील तीन महिन्यांत द्यावी. या अवधीत भरपाई न दिल्यास वार्षिक 12 टक्के दराने व्याज द्यावे लागेल, असे आदेश न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत.
रेल्वे न्यायाधिकरणाने फेटाळला होता दावा
विवेकचा मृत्यू झाल्याची घटना रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 123(क) अंतर्गत ‘अप्रिय घटने’च्या व्याख्येत मोडत नाही, असा निष्कर्ष काढत रेल्वे दावे न्यायाधिकरणाने भरपाईचा दावा फेटाळला होता. 2002 मध्ये दिलेला तो निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List