मुंबईतील आणखी तीन पुलांची होणार पुनर्बांधणी; करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी पुलास महापालिका आणि महारेलची मंजुरी
मुंबईतील रेल्वे मार्गावरील आणखी तीन पुलांची पुनर्बांधणी लवकरच करण्यात येणार आहे. करी रोड, माटुंगा रेल्वे हद्दीतील आणि महालक्ष्मी या पुलांच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला महापालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महारेल) अधिकाऱयांनी बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीत मंजुरी दिली. सध्या या पुलाच्या कामांचा प्राथमिक टप्प्यातील अभ्यास सध्या सुरू असून या पुलांच्या पुनर्बांधणीमुळे वाहतूककोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे मार्गांवरील पूल बांधणीच्या कामात पालिका व महारेल यांच्यात समन्वय असावा, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारी ही बैठक पार पडली. रेल्वे मार्गांवरील पुलांच्या पुनर्बांधणीचा खर्च पालिकेकडून केला जातो, तर प्रत्यक्ष पूल उभारणी महारेलतर्फे करण्यात येत आहे. या बैठकीत रे रोड, भायखळा, दादर येथील टिळक पूल आणि घाटकोपर येथील पुलांच्या कामांचा आढावादेखील घेण्यात आला.
पुलांची कामे वेळेत पूर्ण करा!
सध्या रे रोड पुलाचे 77 टक्के काम पूर्ण झाले असून हा पूल नोव्हेंबर 2024 पर्यंत तर भायखळा पुलाचे 42 टक्के काम पूर्ण झाले असून हा पूल ऑक्टोबर 2025 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. घाटकोपर पुलाचे काम 14 टक्के तर टिळक पुलाचे काम 8 टक्के पूर्ण झाले आहे. पुलांची कामे वेगाने आणि नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे आदेश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List