ठाण्यात म्हस्केंचे वांदे; नाराजांची समजूत घालताना मिंध्यांच्या दमछाक, प्रचाराऐवजी मनधरणीतच जातोय वेळ
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली असताना मिंधे गटाचे उमेदवार यांची मात्र नाराजांची समजूत घालताना दमछाक झाली आहे. प्रचाराऐवजी म्हस्के यांचा नाराजांची मनधरणी करण्यातच वेळ जात असल्याने मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांची चिडचिड वाढली आहे. नवी मुंबईत नाराजी नाट्याचा एक अंक संपला की दुसरा अंक सुरू होत असल्याने म्हस्के पुरते हैराण झाले आहेत.
मिंधे गटाने नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजीचा भडका उडाला. नवी मुंबईत गणेश नाईक समर्थकांनी म्हस्के यांच्या समोरच त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. भाजपच्या वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर नवी मुंबईतील भाजप पदाधिकरी शांत झाले. त्यानंतर म्हस्के यांना गणेश नाईक यांची मनधरणी करण्यासाठी नवी मुंबईत यावे लागले. यानंतर मनसेचे नाराजी नाट्य उफाळून आले. म्हस्केंची प्रचार रॅली नेरुळमध्ये आल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाखेला कुलूप ठोकले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी म्हस्केंनी पुन्हा नवी मुंबईत धाव घेतली.
नाईक पुत्र आनंदाश्रमात आलेच नाहीत
नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंबी नाका येथील आनंदाश्रमात एक बैठक बोलवली होती. या बैठकीला मिंधे गट आणि भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. गणेश नाईक यांनाही या सभेसाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र नाईक यांनी स्वतः न येता संजीव नाईक आणि संदीप नाईक यांना या बैठकीसाठी पाठवले. नाईक बंधू ठाण्यात आले, परंतु ते आनंदाश्रमाकडे फिरकलेच नाहीत. त्यांनी नजीकच्या चिंतामणी चौकात थांबणे पसंत केले. त्यांची मनधरणी करण्यासाठी म्हस्के यांना ही बैठक सोडून चिंतामणी चौकात धावाधाव करावी लागली.
मोदींच्या सभेतून म्हस्के ‘आऊट’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गाजावाजा करत बुधवारी महायुतीची सभा कल्याणमध्ये पार पडली. ही सभा ठाणे, भिवंडी आणि कल्याणमधील उमेदवारांसाठी घेण्यात आली होती. मात्र मोदींच्या या सभेतून म्हस्केंनाच आऊट केले आहे. सभेसाठी उभारलेल्या मंडपात 14 मे रोजी लावण्यात आलेल्या बॅनरवर कल्याण मिंधे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे, भिवंडी भाजपचे उमेदवार कपिल पाटील व ठाण्याचे मिंधे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के या तिघांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र 15 मे रोजी सभेच्या दिवशी या बॅनरवरून म्हस्केंनाच गायब करण्यात आले.
सभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले. तेच तेच भाषण केल्यानंतर श्रीकांत शिंदे आणि भाजपचे कपिल पाटील या दोघांसाठी मतांचा जोगवा मागितला. मात्र मोदींसमोर उत्साहात बोलताना त्यांनी ठाण्याचे मिंधे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही. सभेच्या ठिकाणी लावलेल्या बॅनरवरून गायब झालेला फोटो, त्यापाठोपाठ भाषणातून वगळलेले नाव यामुळे मिंधे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. ठाण्यात अनेक तर्कवितर्वांची चर्चा सुरू झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List