फडणवीसांच्या पोलिसांना छत्रपती संभाजी महाराजांचे वावडे! डीजेचा आवाज वाढला म्हणून धाराशिवमध्ये शिवभक्तांवर अमानुष लाठीमार
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांना छत्रपती संभाजी महाराजांचे वावडे झाले आहे! डीजेचा आवाज वाढल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी धाराशिवात रझाकारी केली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवभक्तांवर अमानुष लाठीमार करण्यात आला. या मारकुट्या पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी बुधवारी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
धाराशिव शहरात मंगळवारी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या भागातील 22 मंडळांनी मिरवणुका काढल्या. देशपांडे स्टँड भागातही सन्मित्र गणेश मंडळाच्या वतीने अशीच दणदणीत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक जल्लोषात सुरू असतानाच पोलिसांचा ताफा त्या ठिकाणी आला. डीजेचा आवाज वाढल्याची तक्रार आली असून, आवाज कमी करा, असे फर्मान पोलिसांनी सोडले. नुसते फर्मान सोडून पोलीस थांबले नाहीत तर डीजेवर लाठी घातली. त्यामुळे डीजे बंद पडला. यामुळे मिरवणुकीचा बेरंग झाला. तेवढ्यात तेथे पोलीस उपअधीक्षक स्वप्निल राठोड आले. डीजेच्या आवाजावरून त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली. ही शाब्दिक बाचाबाची सुरू असताना अचानक पोलिसांच्या अंगात सैतान घुसला. पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर बेभानपणे लाठीहल्ला केला. यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले.
संतप्त कार्यकर्त्यांनी मूर्ती चौकातच ठेवली
पोलिसांनी केलेल्या मोगलाईच्या निषेधार्थ सन्मित्र गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती चौकातच ठेवून आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी दडपशाही करून मूर्ती पोलीस मुख्यालयात नेली. पोलिसांनी केलेल्या गुंडगिरीच्या निषेधार्थ आज सन्मित्र गणेश मंडळाच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन पोलीस उपअधीक्षक स्वप्निल राठोड, पोलीस निरीक्षक पवार आणि पोलीस कर्मचारी स्वामी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली.
मिरवणुकीची परवानगी नव्हती
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील वेगवेगळ्या 22 मंडळांनी मिरवणुका काढल्या. मात्र देशपांडे स्टँड भागातील सन्मित्र गणेश मंडळाच्या मिरवणुकीला परवानगी नव्हती, असा दावा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केला. आचारसंहिता असल्यामुळे डीजे वाजवण्यास मनाई आहे. परंतु तरीही डीजे वाजवण्यात येत असल्याचे आढळून आले. डीजेचा आवाज कमी करण्यासाठी आमचे पोलीस गेले होते. त्यातून हा वाद झाला असेही ते म्हणाले.
दोषी पोलिसांवर कारवाई करा
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने धाराशिव शहरात मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची होती. परंतु पोलिसांनीच कायदा हातात घेऊन शिवभक्तांवर अमानुष लाठ्या चालवल्या. या प्रकरणात दोषी असणार्या पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार वैâलास घाडगे पाटील यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List