मुंबई लुटणाऱयांना जेलमध्ये पाठवू! आदित्य ठाकरे यांचा भाजप आणि मिंध्यांना इशारा
मुंबईला जपणे, जोपासण्याचे काम शिवसेनेने केले आहे. बेस्ट, विजेचे माफक दर, 500 फुटांपर्यंतची घरे करमुक्त केली, मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाला सुरुवात करून गती दिली. मुंबईसाठी काम केले आहे ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. पण भाजपवाले मुंबईद्वेष्टे आहेत, महाराष्ट्रद्वेष्टे आहेत. सत्ता बदलल्यावर भाजप आपल्या डोक्यावर बसली आहे. त्या भाजपला फक्त मुंबई लुटायची आहे. पण शिवसेना मुंबई लुटू देणार नाही. मुंबईला लुटणाऱयांना आपण जेलमध्ये पाठवू, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सायन कोळीवाडय़ामधील प्रतीक्षानगरमध्ये दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई आणि भांडुपमधील केदारे चौक येथे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रतीक्षानगर, भांडुप आणि धारावीमधील झोपडय़ांचा पुनर्विकास हा इथेच झाला पाहिजे. मात्र, भाजपचे उत्तर मुंबईचे लोकसभेचे उमेदवार पियूष गोयल यांना पुनर्विकास करताना झोपडीधारकांना वसई, विरारला पाठवायचे आहे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.
प्रतीक्षानगर येथील सभेला खासदार कुमार केतकर, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, शिवसेना उपनेत्या संजना घाडी, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, शिवसेना विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, युवासेना कार्यकारिणी सदस्य सुप्रदा फातर्पेकर, विभाग संघटक पद्मावती शिंदे, विधानसभा संघटक गजानन पाटील, रामदास कांबळे, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या निर्मला सामंत प्रभावळकर, राष्ट्रवादीचे नरेंद्र वर्मा, भाकपचे मिलिंद रानडे, युथ रिपब्लिकन पक्षाचे सागर संसारे, काँग्रेसचे रवी राजा, आप जिल्हाध्यक्ष संदीप पटके, शेकापच्या सौम्या कोरडे, उपेंद्र दोषी उपस्थित होते तर भांडुपमध्ये झालेल्या सभेला उपनेते सचिन अहिर, शिवसेना आमदार सुनील राऊत, वैभव नाईक, रमेश कोरगावकर, विभागप्रमुख सुरेश पाटील, उपनेत्या जान्हवी सावंत, काँग्रेसचे चरणसिंह सप्रा, राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष राखी जाधव, सपाचे निसार खान आदी मान्यवर उपस्थित होते.
मोठे बॅनर्स दिसतात, पण कामे दिसत नाहीत
मिंधे सरकारने महापालिका अधिकाऱयांना हाताशी धरून रस्ते घोटाळे केले आहे. मुंबईत 6 हजार कोटींचा रस्ते घोटाळा मी बाहेर काढला. मुंबईत भाजप आणि मिंधे सरकारने कामे केल्याचे मोठमोठे बॅनर्स दिसतात. पण प्रत्यक्षात काम मात्र कुठेच दिसत नाही, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List