मोदींची वाराणसीतील एकाही गावाला ना भेट, ना विचारपूस
माजी पंतप्रधान राजीव गांधी, इंदिरा गांधी हे गावागावांत जाऊन लोकांशी संवाद साधायचे. पण, 10 वर्षे खासदार असूनही मोदींनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातील एकाही गावाला ना भेट दिली ना तिथल्या शेतकऱयांची विचारपूस केली, असा आरोप करत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी गरीबांविषयी दाखवत असलेल्या दिखाऊ कळवळ्यातील हवाच काढून घेतली.
आपले पंतप्रधान देशाची संपूर्ण संपत्ती हे चार-पाच श्रीमंतांना देत आहेत. त्यांच्या मोठमोठय़ा कार्यक्रमांत तुम्हाला एकही गरीब दिसत नाही, अशी टीका त्यांनी काँग्रेसचे रायबरेली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गांधी यांच्यासाठी येथे आयोजित निवडणूक सभांमध्ये केली. गेल्या दहा वर्षांत जनतेसाठी काहीही न करणाऱया भाजपने मतदारांना भुलवण्यासाठी आता धर्माधारित प्रचार सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
मोदींच्या आरोपांची उडवली खिल्ली
मोदी म्हणतात की काँग्रेस सत्तेवर आली तर तुमचे मंगळसूत्र चोरतील, तुमची म्हैस हिसकावून घेतील. यावर जनताच हसत आहे. पंतप्रधानांनी कोणतेही काम केले नाही म्हणून ते बोलत आहेत हे आता सगळेच जाणतात, असे म्हणत त्यांनी मोदींच्या आरोपांची खिल्ली उडवली.
निवडणूक रोख्यांवरून साधला निशाणा
ते आम्हाला भ्रष्ट म्हणतात. पण काँग्रेस पक्ष 55 वर्षांत सत्तेत असूनही श्रीमंत पक्ष होऊ शकला नाही, पण भाजप 10 वर्षांच्या आत जगातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला आहे. ते काळा पैसा परत आणण्याबद्दल आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याबद्दल बोलत असत. मला वाटते की त्यांनी हा सर्व काळा पैसा त्यांच्याच पक्षात जमा केला, असा वर्मी घाव घालत प्रियंका यांनी भाजपवर निशाणा साधला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List