लोकशाहीवर विश्वास नसणारे भाजप सरकार हद्दपार करा; शरद पवार यांची कल्याणमध्ये विराट सभा
पंतप्रधान हे देशाचे प्रमुख असतात. राज्याची सुखदुःखे ते समजून घेतात. परंतु गेल्या 10 वर्षात मोदींनी प्रादेशिक पक्ष संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यांचा कारभार हुपूमशाहीच्या दिशेने चालला आहे. अशा लोकांच्या हातात सत्ता ठेवणे हे देशहिताचे नाही. ही निवडणूक देशाला योग्य रस्ता दाखवणारी ठरलीच पाहिजे. त्यामुळे लोकशाहीवर विश्वास नसलेले भाजप सरकार हद्दपार करा आणि देश वाचवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार बाळय़ामामा म्हात्रे ऊर्फ सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची सभा वासिंद येथील निसर्ग गार्डनच्या समोरील मैदानात व कल्याण पश्चिम येथील यशवंतराव चव्हाण मैदानावर आज झाली. यावेळी बोलताना पवार यांनी भाजपच्या संविधानविरोधी कारभाराचा लेखाजोखा मांडला.
पवार म्हणाले, 1952 पासूनच्या लोकसभा निवडणुका पाहिल्या तर याआधीचे सर्व पंतप्रधान निवडणुकीच्या सभेत पाच वर्षातील कामाचा आढावा मांडायचे. देशापुढील आव्हाने, समस्या यांचा उहापोह करायचे. देश कसा भक्कम राहील, कसा पुढे जाईल अशी त्यांच्या भाषणात मांडणी असायची. मात्र आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे या सर्वाला छेद देणारी आहेत. ज्या ठिकाणी जातील तिथे लिहून दिलेली स्थानिक भाषेतील भाषणे वाचून लोकांना खूश करत आहेत. देशातील प्रश्नांवर बोलण्याऐवजी विरोधी नेत्यावर टीका करण्यात धन्यता मानतात. देशाच्या सीमा सुरक्षित करण्याऐवजी आणि देशहित, ऐक्य अबाधित राखण्याऐवजी आपल्यावर टीका करणाऱयांना तुरुंगात टाकण्यात ते धन्यता मानत आहेत. लोकशाहीच्या दृष्टीने हे घातक असल्याची चिंताही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
संजय राऊत जागृत नेते
संजय राऊत हे महाराष्ट्राच्या हितासाठी सदैव जागृत राहणारे नेते आहेत, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले. कोणीही चुकीच्या धोरणावर बोलले की, त्यावर तत्काळ टीका, टिप्पणी करून त्यांना जागा दाखवणे हे संजय राऊत यांचे वैशिष्टय़ आहे. मोदी आणि भाजपवर टीका केली म्हणून त्यांची रवानगी तुरुंगात केली. परंतु तरीही राऊत नमले नाहीत. उलट ते अधिक ताकदीने उभे राहिले, असेही पवार म्हणाले.
मोदी, शहांनी हिंसाचाराला बळ दिले – अॅड. असीम सरोदे
अॅड. असीम सरोदे यांनी यावेळी मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा पंचनामा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मांध, अवैज्ञानिक आणि बेताल वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. मोदी, शहा हे हिंसाचाराला बळ देत असून सामान्य माणसाच्या श्रमाला आणि प्रतिष्ठsला टाच लावत आहेत. त्यामुळे सर्वाधिक भ्रष्ट असणाऱया मोदी सरकारला हटवा आणि संविधान वाचवा, असे आवाहनही त्यांनी केले.
देशावर 210 लाख कोटींचे कर्ज
मोदी सरकारने देशावर 210 लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. त्यामुळे जन्माला येणाऱया प्रत्येक बालकाच्या डोक्यावर एक ते सव्वा लाख रुपयांचे कर्ज आहे. उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात आहे. अदानी, अंबानीच्या ताब्यात देश दिला जात आहे. असे फटकारे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी सरकारला लगावले.
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, सुनील भुसारा, शिवसेना उपनेते विजय साळवी, अल्ताफ शेख, उपनेत्या ज्योती ठाकरे, माकपा पॉलीट ब्युरोचे सदस्य का@. अशोक ढवळे, भिवंडी लोकसभा संपर्पप्रमुख रुपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, माजी आमदार पांडुरंग बरोरा, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुकाप्रमुख बाळा धानके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश धानके, मनोज विशे, काशीनाथ तिवरे, विजय भगत, विद्या वेखंडे, रश्मी निमसे, तालुका संपर्पप्रमुख गणेश राऊत, कल्याण शहरप्रमुख सचिन बासरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, रवींद्र कपोते, जयेश वाणी, अनिल डेरे, विजय काटकर, महेश तपासे, काँग्रेसचे सचिन पोटे, धनंजय शिंदे, उमेश बोरगावकर, कांचन पुलकर्णी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List