“10 जूनचं सोडा, भाजप पुढची 10 वर्ष…”, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा मोदींवर हल्लाबोल
एकीकडे देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून दुसरीकडे ओडिशामध्ये विधानसभेचे वारे वाहत आहे. लोकसभेसोबतच येथे विधानसभा निवडणुकाही पार पडत आहेत. याच्या प्रचारासाठी ओडिशामध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि बीजेडीवर निशामा साधला होता. त्यानंतर आता नवीन पटनायक यांनीही एक व्हिडीओ जारी करत मोदींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“भारतीय जनता पक्ष पुढील 10 वर्ष ओडिशाच्या लोकांचे मन जिंकू शकत नाही, त्यामुळे 10 जूनला सरकार बनवणे तर दूरची गोष्ट आहे”, अशा शब्दात नवीन पटनायक यांनी भाजपवर हल्ला केला. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी यांना 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांचीही आठवण करून दिली.
ओडिशातील एका सभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी नवीन पटनायक यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ओडिशातील जिल्ह्यांची नावे सांगावीत असे आव्हानही मोदींनी दिले होते. याला नवीन पटनायक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गेल्या 24 वर्षापासून मला काय माहितीय आणि काय नाही हे ओडिशाच्या जनतेला चांगले माहितीय. परंतु मोदीजी उडिया ही एक शास्त्रीय भाषा तुम्हाला माहिती का? तुम्ही देशभरातील भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी 1 हजार कोटी रुपये दिले, परंतु उडियासाठी आम्हाला एक रुपयाही दिला नाही. उडिया संगीताला शास्त्रीय दर्जा देण्याच्या मागणीकडेही दुर्लक्ष केले. आम्ही यासाठी प्रस्तावही पाठवला होता, मात्र दोन वेळी तुम्ही तो फेटाळून लावला, अशा शब्दात पटनायक यांनी मोदींचा समाचार घेतला.
ମୋର କ’ଣ ମନେ ଅଛି କି ନାହିଁ ସେଇଟା ମୋର ପ୍ରିୟ ସାଢ଼େ ଚାରି କୋଟି ଓଡ଼ିଶାବାସୀ ଜାଣିଛନ୍ତି। #JodiShankha pic.twitter.com/OpkecsQt72
— Naveen Patnaik (@Naveen_Odisha) May 11, 2024
ओडिशामध्ये अनेक महाव व्यक्ती होऊन गेले. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात अमुल्य योगदान दिले. परंतु त्यातील एकाचाही भारतरत्नाने सन्मान करण्यात आला नाही. बीजू पटनायक हे देखील देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी योग्य नाहीत असे तुम्हाला वाटते, असेही ते म्हणाले. यावेळी पटनायक यांनी मोदींच्या गत 10 वर्षाच्या कार्यकाळाचाही उल्लेख केला.
2014 आणि 2019च्या निवडणुकीवेळी ओडिशाच्या लोकांना दिलेली आश्वासने तुम्हाला आठवतात का? शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एमएसपी दुप्पट करण्याचे, महामार्ग बनवण्याचे, कोळसा खाणींची रॉयल्टी वाढवण्याचे, 2 कोटी नोकऱ्या देण्याचे, पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रणात ठेवण्याचे आणि ओडिशातील लोकांसाठी मोबाईल कनेक्टिव्हीटी वाढवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तुम्ही हे विसरलात, असा टोलाही पटनायक यांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List