देवेंद्र फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं; संजय राऊत यांची घणाघाती टीका
देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका. नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजप निवडणूक हरली होती. फडणवीस यांना हे माहिती नाही. ते राजकारणातील फार कच्चे मडके आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी मिध्यांसह भाजपवरही आसूड ओढले.
युतीचे सरकार आल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली, या फडणवीस यांच्या आरोपांचाही राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. आम्ही स्वप्नात जगत नाही. आमची स्वप्न राष्ट्रहीत आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आहेत. पण तुम्हाला झालेल्या स्वप्नांचा आजार आता हळूहळू दूर व्हायला लागला आहे. राणे यांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मुख्यमंत्री केले होते आणि उद्धव ठाकरे यांनीही त्यास पाठींबा दिला होता. राणेंच्याच नेतृत्वात शिवसेना-भाजप निवडणूक लढली आणि हरली. हे फडणवीस यांना माहिती नसेल, कारण ते तेव्हा फार राजकारणात नव्हते, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले.
मिंधे, अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही
मुख्यमंत्री वारंवार डॅमेज कंट्रोलसाठी नाशिकला येत आहेत. यावरही राऊत यांनी भाष्य केले. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वत:चे काहीतरी असावे लागते. मोदी-शहांच्या मदतीने शिवसेना, धनुष्यबाण चोरला. त्यांच्यामागे लोकांनी का उभे रहावे? त्यामुळे मी वारंवार सांगतोय की अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना एकही जागा मिळणार नाही. पैशाच्या थैल्या वाटू द्या किंवा टेम्पो भरून माल आणू द्या लोकं त्यांना मत देणार नाहीत.
महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही महाराष्ट्रात ठाण मांडला असून अमित शहाही येऊन-जाऊन आहेत. याचा काहीही परिणाम महाराष्ट्रावर होणार नसून महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते तन, मन, धन एकत्र करून काम करताहेत. तसे महायुतीमध्ये दिसत नाही. अजित पवारांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्या असून ते मोकळे झाले आहेत. मिध्यांची धावपळ सुरू आहे. पण ही त्यांची अखेरची फडफड आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
बिल्डर शेतकरी कसे झाले?
नाशिक महानगरपालिकेतील 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा 14 मे रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह समोर आणणार असल्याचा पुनरुल्लेखही राऊत यांनी केला. नाशिक महानगरपालिका, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नगरविकास मंत्रालय, नाशिकचे स्थानिक पुढारी आणि त्यांच्या मर्जीतले बिल्डर यांनी 800 ते 900 कोटींची लूट कशी केली? त्यात कोण सहभागी आहेत? कोण लाभार्थी आहेत? हे उघड करावेच लागेल. जनतेच्या पैशाची लूट होत असेल आणि पंतप्रधान मोदी डोळ्याला पट्टी बांधून बसणार असतील तर तुम्ही किती खोटारडे आणि भंपक आहेत हे दाखवावेच लागेल. नाशिक महानगरपालिकेत 800-900 कोटींची लूट होते, कुठे आहे सीबीआय? कुठे आहे ईडी? शेतकरी नसलेल्या बिल्डरांना भूसंपादनाच्या नावाखाली पैसे मिळालेले आहेत. बिल्डर अचानक शेतकरी कसे झाले हेच या घोटाळ्यातील मोठे सूत्र असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List