मोदी स्वतःसाठी नाही तर अमित शहांसाठी मत मागतायत; अरविंद केजरीवाल यांचा दावा
पंतप्रधान मोदी हे देशात हुकूमशाही आणू पाहतायत. त्यासाठी ‘एक देश, एक नेता’ अशी मोहीम ते राबवत असून भाजपची सत्ता आल्यास विरोधी पक्षातील अनेक नेते तुरुंगात असतील. तसेच भाजपमधीलही मोठे नेते राजकीय पटलावर दिसणार नाहीत. मोदी स्वतःसाठी नाही तर अमित शहांसाठी मत मागतायत. दोन महिन्यांत उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्रीही बदलला जाईल, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केला.
दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात अंतरिम जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आलेल्या मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केजरीवाल यांनी इंडिया आघाडीला तुमचा पंतप्रधान कोण? असा सवाल करणाऱया भाजपलाच तुमचा पंतप्रधान कोण? असा प्रश्न करत नरेंद्र मोदींच्या पदावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास सप्टेंबर 2025 नंतर अमित शहा यांना पंतप्रधान केले जाईल, असे केजरीवाल म्हणाले.
4 जूननंतर केंंद्रात इंडिया आघाडीचे सरकार
या निवडणुकीत उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत भाजपच्या जागा कमी होणार आहेत. भाजपला 200 जागांवरच समाधान मानावे लागेल. त्यामुळे 4 जूननंतर पेंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन होईल, ज्यामध्ये ‘आप’चाही समावेश असेल, असा दावा केजरीवाल यांनी केला.
आज एका हुकूमशहाला देशातून लोकशाही संपवायची आहे. त्या हुकूमशहाविरुद्ध मी मनापासून आणि जिवाने लढत आहे. मला 140 कोटी लोकांचा पाठिंबा हवा आहे. माझा देश वाचवा. माझ्या देशाला या हुकूमशाहीपासून वाचवा.
तुम्ही जर भाजपला मत देण्यासाठी जाणार असाल तर लक्षात ठेवा की, ते मत मोदींसाठी नव्हे तर अमित शहांसाठी जाणार आहे. जर मोदींनी निवृत्ती घेतली तर त्यांची गॅरंटी कोण पूर्ण करणार? अमित शहा मोदींची गॅरंटी पूर्ण करणार का? असा सवाल केजरीवाल यांनी केला.
मोदींच्या निवृत्तीची वेळ आली
मोदी पुढच्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होत आहेत. त्यांनी स्वतःच 2014 रोजी नियम लागू केला होता की, जो नेता 75 वर्षांचा होईल त्याला निवृत्त केले जाईल. त्यांनी सर्वात आधी आडवाणींना, मुरलीमनोहर जोशी, यशवंत सिन्हा, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केले. आता मोदींच्या निवृत्तीची वेळ आली आहे, असे केजरीवाल म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List