पक्षफोडे, घरफोडे यांना घरचा रस्ता दाखवा! शिवसेनेचे राजन विचारे यांना विजयी करण्याचा निर्धार
नरेंद्र मोदी व अमित शहा या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना संताजी- धनाजीप्रमाणे फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे तीनच नेते दिसतात. मोदी- शहा जोडीने गद्दारांना सोबत घेऊन निष्ठावंतांची घरे फोडली, पक्ष फोडले. अशा पक्षफोडे व घरफोड्यांना थेट घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केले. भाईंदरमधील इंडिया आघाडीच्या दणदणीत झालेल्या प्रचार सभेत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धारही करण्यात आला.
नवघर नाका येथील मैदानावर गुरुवारी रात्री झालेल्या प्रचार सभेस तुफान गर्दी झाली होती. या सभेत बोलताना विनायक राऊत यांनी गद्दारांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, एकीकडे दुसऱ्यांची घरे फोडणारे गद्दार तर दुसरीकडे माणसे जोडणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व इंडिया आघाडीचे नेते आहेत. अशा गद्दारांना लोकसभा निवडणुकीत मतदारच धडा शिकवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजन विचारे यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत भाजपला हद्दपार करणारच असे ठणकावले. शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांनीदेखील गद्दारांचा खरपूस समाचार घेतला.
ओवळा-माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विक्रम तरे-पाटील, कम्युनिस्ट पार्टीचे किशोर सामंत, आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष, धनंजय शिंदे, उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, धनेश पाटील, संदीप पाटील, लक्ष्मण जंगम, जयराम मेसे, ब्रिजेश तिवारी, अझम भारती संस्थेचे अध्यक्ष अझम उद्दीन, राजेश सिंह, प्रवीण पाटील, रोशनी गायकवाड, राज राजापूरकर उपस्थित होते.
गद्दारांना गद्दार नाही तर महात्मा म्हणणार काय?
‘मातोश्री’शी गद्दारी करून फक्त स्वार्थासाठी काहींनी भाजपशी सूत जुळवले आणि ते मोदीवासी झाले. या गद्दारांनी मतदारांचीही सपशेल फसवणूक केली आहे. त्यामुळे गद्दारांना गद्दार नाही तर महात्मा म्हणणार काय, असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या भाषणात केला. शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनीही मोदींवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, प्रत्येक भाषणात नरेंद्र मोदी आपली गॅरंटी असल्याचे सांगतात, पण या गॅरंटीला वॉरंटी नाही. काँग्रेस नेते मुझफ्फर हुसैन यांनी सांगितले की, गद्दारीचा कलंक मीर जाफर याच्यावर लागला होता. २५० वर्षांनंतरही तो पुसला गेला नाही. अशीच अवस्था मिंध्यांचीदेखील झाल्याशिवाय राहणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List