‘इंडिया’ने घेरले म्हणूनच नरेंद्र मोदी म्हणताहेत, अदानी-अंबानी मला वाचवा!
दहा वर्षे मोदींनी अदानी आणि अंबानींचे नाव घेतले नाही, पण आता ते प्रचंड घाबरले आहेत. त्यामुळेच ते आपल्या या दोन मित्रांची नावे घेत आहेत. ते म्हणत आहेत, मला वाचवा, इंडिया आघाडीने मला घेरले आहे, मी हरतोय… मला वाचवा… अदानी… अंबानी.. मला वाचवा… अशा शब्दांत राहुल गांधी यांनी कनौज येथील प्रचारसभेत मोदी सरकारवर तोफ डागली. तर ज्या दिवशी मोदींनी व्यासपीठावरून अदानी आणि अंबानींचे नाव घेतले त्याच दिवशी पंतप्रधान मोदी हरले, असे कानपूर येथील सभेत ठामपणे सांगितले.
कानपूरला मँचेस्टर बोलले जायचे. येथील कारागीरांमध्ये इतकी क्षमता आहे की, ते कुणालाही आव्हान देऊ शकतात. मेड इन कानपूरसमोर मेड इन चायना कधीच टिकू शकत नाही. पण मोदींनी अदानींना वाचवण्यासाठी, अदानींच्या पैशांसाठी, अदानींच्या जमिनीसाठी तुमच्या कानपूरचे फक्त हातच नाही तर गळाही कापला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. कोरोना येतो, रुग्णालयात व्हेंटिलेटर नसतात, ऑक्सिजन नसतात, गंगेत मृतदेहांचे खच पडलेला असतो आणि नरेंद्र मोदींची पार्टी जेव्हा तुम्ही मरत असता तेव्हा कोरोना व्हॅक्सिन बनवणाऱयांकडून पैसा घेत होती. करोडो रुपये मोदींच्या पार्टीने कोविड व्हॅक्सिन बनवणाऱयांकडून पैसा घेतला. तुम्ही मरत होतात आणि ते तुम्हाला सांगत होते, टाळय़ा वाजवा… मोबाईल पह्नचे फ्लॅश लावा… आणि अदानींना सांगतात पैसे मोजा… टेम्पोतून पाठवा मला, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.
अदानी, अंबानींची ईडी, सीबीआय चौकशी का केली नाही?
मोदींना कसे माहिती की अदानी टेम्पोतून पैसे पाठवतात, असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला. हिंदुस्थानच्या नोटबंदीवाल्या पंतप्रधानांनी सांगितले की, अदानी आणि अंबानी काळा पैसा देतात. मग जर ते काळा पैसा देतात तर मग तुम्ही त्यांच्यावर ईडी, सीबीआयची चौकशी का लावली नाही? कारण ते तुमचे मित्र आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
लिहून घ्या… 4 जून 2024 ला मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान राहणार नाहीत
लिहून घ्या… 4 जून 2024 ला नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान राहणार नाहीत, अशी गॅरंटी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. आम्हाला जी मेहनत करायची होती ती आम्ही केलीय. आता तुम्ही बघा उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला 50 पेक्षा कमी एकही जागा मिळणार नाही. प्रत्येक राज्यात आम्ही भाजपाला रोखलेय. प्रसारमाध्यमातील आपल्या बंधू-भगिनींनाही कळलेय राहुल गांधी जे बोलत आहेत ते खरे आहे, मोदी पंतप्रधान बनणार नाहीत. खतम कहानी, जसे इंग्रजीत बोलतात गुड बाय थँक्यू… अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. कानपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते
मेड इंडियाला मोदींनी संपवले
चुकीची जीएसटी लावून, नोटबंदी करून कानपूरला त्यांनी संपवले. मोदी मेड इंडियाच्या गोष्टी करतात, पण कानपूर मेड इन इंडिया आहे.. मेड इन मुंबई, मेड इन लखनऊ, मेड इन बंगळुरू… हाच तर आहे मेड इन इंडिया… पाच वेगवेगळय़ा जीएसटी लावल्या. तुम्ही कुठल्याही छोटय़ा व्यावसायिकाला विचारा, मजुराला विचारा, कारागीराला विचारा, जीएसटी आणि नोटबंदीमुळे किती नुकसान झाले ते तुम्हाला सांगतील. अदानींसाठी आम्हाला आणि आमच्या बिझनेसला संपवले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. देशात अशी अनेक शहरे आहेत, जी मेड इन चायनाचा सामना करू शकतात. त्यापैकी तुमचे शहर आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या हातात घातलेल्या बेडय़ा जोपर्यंत तुम्ही नाही तोडत तोपर्यंत मेड इन कानपूर बनू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List