हा सूर्य आणि हा जयद्रथ! कृषीमंत्री असतानाचा हिशेब देत शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीची पुरंदर येथे सभा झाली. या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. एवढेच नाही कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा हिशेब मांडत पवारांनी मोदींवर निशाणा साधला.
हा देश 70 टक्के लोकांच्या कष्टाने, काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यामुळे चालतो. पण मोदी सरकारने शेतकऱ्यांची अवस्था बिकट करून ठेवली आहे. शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. थकबाकीदारांची संख्या वाढत आहे. याला मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत मिळत नाहीय. खाणाऱ्याला धान्य किंवा शेतमाल स्वस्त मिळावा, पण पिकवणारा टिकला नाही तर खाणाऱ्याने खायचे काय? मोदींचे धोरण पिकवणाऱ्या ऐवजी खाणाऱ्याला महत्त्व असे आहे, असा घणाघात शरद पवार यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्याचा संसार चालवायचा असेल तर त्याच्या घामाची किंमत त्याला द्यायला हवी. 10 वर्ष शेतीचा कारभार माझ्या हातात होता आणि 10 वर्ष मोदी सरकारच्या हातात आहे. मी कृषीमंत्री असताना भाताचा दर 138 रुपयांनी वाढवला, पण मोदींनी 10 वर्षात फक्त 66 रुपयांची वाढ केली. गव्हाचे दर आम्ही 122 रुपयांनी वाढवले, तर मोदींच्या काळात फक्त 62 रुपयांनी वाढला.
ऊसाची किंमत 187 रुपयांनी वाढवली होती, तर मोदींच्या काळात फक्त 50 रुपये वाढ झाली. सोयाबिनचा भाव 175 रुपये होता, मोदींच्या काळात हाच दर 79 रुपये आहे. कापसाचा दर आम्ही 114 रुपयांनी वाढवला, पण भाजपच्या काळात फक्त 78 रुपयांनी वाढला. आम्ही मक्याची किंमत 159 रुपयांनी वाढवली, तर मोदींच्या काळात यात फक्त 59 रुपये वाढ झाली. हरभऱ्याची किंमत 121 रुपयांनी वाढवली, पण मोदींच्या काळात या फक्त 75 रुपयांची वाढ झाली. तुरीचा भाव आमच्या काळात 216 रुपयांनी वाढला होता, तर मोदींच्या काळात यात फक्त 62 रुपये वाढ झाली, असेही पवारांनी सांगितले.
हे आकडे यासाठी देतोय की देशातील 70 टक्के वर्ग शेतकी करतो त्याला त्याच्या घामाची, कष्टाची किंमत देण्याची तयारी आजच्या राज्यकर्त्यांची नाही. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुधारायचे असेल तर मोदींचचच्या हातातील कारभार काढून घ्यावाच लागेल, असे म्हणत पवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List