यावेळी लढा भाजप आणि ईव्हीएमशी; दिग्विजय सिंह यांचा मोदी सरकारवर हल्ला
यावेळी आपला लढा भाजप आणि ईव्हीएमशी असून इतके मतदान करा की ईव्हीएम आणि भाजप दोघांचा पराभव होईल, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मध्य प्रदेशातील राजगढ येथून दिग्विजय सिंह लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तब्बल 33 वर्षांनंतर दिग्विजय सिंह राजगढमधून निवडणूक लढवत असून यावेळी ते मोठय़ा फरकाने निवडून येतील असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
राजगढमधील ग्रामीण भागातील स्थिती अत्यंत भयावह होती आणि आजही आहे. येथे भीषण पाणीटंचाई असून फूड प्रोसेसिंग युनिटचे दिलेले आश्वासनही पूर्ण करण्यात आलेले नाही, असे दिग्विजय सिंह म्हणाले. राजगढ सपाट प्रदेश असून येथे पाणी साठवले गेले नाही तर ते वाचवता येणार नाही. वॉटर शेड हे माझे मिशन होते. शेतीला पाणी, गावात पाणी देण्याचे काँग्रेसचे लक्ष्य असून सध्या येथे दुष्काळसदृश स्थिती असून येथून मोठय़ा प्रमाणावर नागरिकांचे स्थलांतर होत आहे, ही मोठी समस्या आहे, याकडेही दिग्विजय सिंह यांनी लक्ष वेधले. दिग्विजय सिंह यांनी 1984 आणि 1991 मध्ये राजगढची जागा जिंकली होती, परंतु 1989 मध्ये याच ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता. दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह हेदेखील येथून पाचवेळा जिंकले आहेत. यावेळी दिग्विजय सिंह यांचा सामना दुसऱयांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या रोडमल नागर यांच्याशी आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List