मिंध्यांनी भ्रष्टाचाऱयांना उमेदवारी दिली, आता सोमय्यांना त्यांचे प्रचारक बनवा
भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मिंधे गटाने मुंबईतून उमेदवारी दिली. भाजपला हे मान्य आहे का? भाजपमध्ये भ्रष्टाचाराच्या मेरिटवरच उमेदवारी मिळते का, असा सवाल शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी आज केला. भ्रष्टाचाऱयांना उमेदवारी दिली, आता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या यांना भाजपने त्यांचे प्रचार प्रमुख बनवावे, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.
अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मिंधे गटाने उत्तर-पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून यामिनी जाधव यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. वायकर, यशवंत जाधव, यामिनी जाधव यांच्यावर किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाका अशा वल्गना केल्या होत्या. पक्षाच्या आदेशावरूनच आपण ते काम केल्याचे सोमय्या म्हणाले होते. हे उमेदवार महायुतीला मिळाले याचे श्रेय सोमय्यांना जाते. त्यामुळे भाजपने सोमय्यांना त्यांचे प्रचारप्रमुख बनवावे आणि ते उमेदवार किती स्वच्छ आहेत हे सध्या मोकळेच असलेल्या सोमय्यांनी जनतेला सांगावे, असे अनिल परब म्हणाले.
जे भाजप नेते आणि कार्यकर्ते इतकी वर्षे पक्षाशी प्रामाणिक सेवा करताहेत त्यांना आता वायकर आणि जाधवांच्या सतरंज्या उतराव्या लागणार. त्यांना विजयी करा म्हणून घोषणा द्याव्या लागणार. झेंडे, फलक मिरवत त्यांच्या मागे नाचावे लागणार आहे. या दुर्दैवी बाबी भाजपा नेतृत्वाला मान्य आहेत का, असाही सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
अनिल परब म्हणाले की, वायकरांची याचिका मी हाताळली आहे. उच्च न्यायालयात वायकर हरले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात केस गेली. त्यात मुंबई महापलिका म्हणते आम्ही या प्रकरणावर पुनर्विचार करू. वायकर सरेंडर झाल्यावर आता महापलिका काय करते हे बघावे लागेल, असे वायकर म्हणाले.
आता वायकरांना कळेल खरी शिवसेना कोणाची
मिंधे गटातून उमेदवारी मिळाल्यानंतर रवींद्र वायकर यांनी खऱया शिवसेनेतून उमेदवारी मिळाल्याचे म्हटले होते. त्याबाबत माध्यमांनी अनिल परब यांना विचारले असता, वायकरांना येत्या निवडणुकीत खरी शिवसेना कोणाची हे दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला.
अमोल कीर्तिकर नवखे नाहीत
अमोल कीर्तिकर हे नवखे नसून गेली दहा वर्षे ते त्यांचे वडील खासदार गजानन कीर्तिकर यांचे काम पाहत होते. त्यामुळे मतदारसंघाची गल्ली न गल्ली त्यांना माहीत आहे आणि अमोल एकटे नाहीत तर त्यांच्यासोबत मी स्वतः, शिवसेना नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू अशी मोठी फौज आहे, असे अनिल परब म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List