सूर्य आग ओकतोय; मुंबईकरांची लाहीलाही! सांताक्रुझ 38 अंशांवर; ठाण्यात 41 अंशांनी होरपळ
मुंबई-ठाण्यासह राज्यभरात जणू सूर्य आग ओकत असल्याचे चटके नागरिकांना बसत आहेत. गेले काही दिवस हेलकावे खात असलेल्या मुंबईच्या तापमानाने रविवारी पुन्हा उच्चांकी पातळी गाठली. सांताक्रुझमध्ये 38.1 अंशांची नोंद झाली, तर ठाण्याचा पारा 41 अंशांवर झेपावला. सुट्टीच्या दिवशी मुंबई-ठाणेकरांची प्रचंड लाहीलाही झाली. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानलाही उन्हाचा तडाखा बसून तिथले तापमान 39 अंशांवर पोचले.
मे महिना सुरू होण्यापूर्वीच राज्यात उन्हाचा तडाखा भयंकर वाढला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही उष्णतेची लाट धडकली आहे. उत्तरेकडून कोरडे आणि उष्ण वारे वाहू लागल्याने मुंबई-ठाण्यासह राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबईत शनिवारी 36 अंश तापमान होते. त्यात दुसऱयाच दिवशी म्हणजे रविवारी पारा थेट 39 अंशांच्या घरात गेला. पुढील दोन-तीन दिवस कमाल तापमान 39 ते 40 अंशांच्या आसपास राहील, तसेच किमान तापमानातही दोन ते तीन अंशांची वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागासह मुंबई महापालिकेने केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List