मुंबई आणि ठाण्याला पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी
हवामान विभागाने सोमवारी मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस मुंबई आणि ठाणेकरांना भीषण उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. याखेरीज आर्द्रता वाढण्याचा आणि उष्ण वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
या उष्णतेपासून वाचण्यासाठी हवामान विभागाने काही खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील चार दिवसांसाठी मुंबई-ठाण्यात तापमान 35 अंश सेल्सिअस किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान असू शकतं. त्यामुळे वातावरणातील आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्द्रतेमुळे उष्ण वारेही वाहू शकतात. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. पश्चिमी वारे वाहणार असल्याने मुंबईच्या तापमानात वाढ होणार आहे.
त्यामुळे पुढील चार दिवसांत शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं, पूर्ण बाह्यांचे, अंग झाकतील असे कपडे परिधान करावेत, तसंच उन्हात बाहेर पडण्याचा नाईलाज असेल तर गॉगल किंवा छत्री वापरावी. तसंच, चेहरा, डोकं बांधून बाहेर पडावं. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा. त्यासाठी वेळोवेळी पाणी, फळांचे रस यांचं सेवन करत राहा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List