जनता पेटली म्हणूनच महाराष्ट्रात उष्णता वाढली! खामगावातील विराट सभेत उद्धव ठाकरे कडाडले
गेल्या महिन्यापेक्षा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत उष्णता वाढली आहे, पण केवळ सूर्य आणि जमीन तापल्याने ही उष्णता नाही तर महाराष्ट्रातील जनता हुकूमशाहीविरुद्ध पेटून उठली आहे म्हणूनच उष्णता वाढली आहे, असे नमूद करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच लाट असल्याचा विश्वास खामगावातील विराट सभेत व्यक्त केला.
एका बाजूला उद्धव ठाकरेंचे वचन आणि दुसऱ्या
बाजूला मोदी गॅरंटी. आता जनताच निर्णय देईल.
मोदींना मला सांगायचे आहे, तुमच्या हातात जी राखी बांधली आहे तीच तुम्हाला भ्रष्टाचाराचा आरसा दाखवत आहे. राखी बांधल्यावर चौकशी रद्द आणि केजरीवाल, सोरेन यांना अटक हा कोणता न्याय?
बुलढाणा लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी खामगाव येथे आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपसह मिंधे गटातील गद्दारांचाही समाचार घेतला. भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेतात आणि मोदींची गॅरेंटी म्हणतात, असा टोला त्यांनी लगावला.
सभेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार नितीन देशमुख, आमदार राजेश एकडे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, कृष्णराव इंगळे, राहुल बोन्द्रs, दिलीपकुमार सानंदा, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, वसंतराव भोजने, सहसंपर्कप्रमुख छगनराव मेहेत्रे, दत्ता पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपच्या सातशे पिढय़ा उतरल्या तरी आमच्या हृदयातील भवानी काढू शकणार नाही
भारतीय जनता पक्षाच्या सातशे पिढय़ा उतरल्या तरी आमच्या हृदयातील भवानी आणि शिवाजी काढू शकणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठासून सांगितले. आम्ही ‘जय भवानी, जय शिवाजी’ बोलणारच. हिंमत असेल तर माझ्यावर कारवाई करून दाखवा, असे आव्हानच त्यांनी निवडणूक आयोगाला दिले. तुम्ही जय श्रीराम म्हणता, कर्नाटकात बजरंग बली की जय म्हणता. आम्ही आमच्या कुलदेवतेचा, भवानी मातेचा गजर करतोय, असे ते म्हणाले.
नकली शिवसेना म्हणता, जनताच तुम्हाला जागा दाखवेल
शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवरही आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला दोनदा पंतप्रधान करण्यासाठी जिवाचे रान केले त्यांनाच तुम्ही नकली म्हणता? नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. शिवरायांचा भगवा घेतलेल्या शिवसैनिकांना नकली म्हणताय, तुम्हाला महाराष्ट्राची जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी मोदींना दिला.
जिजाऊंच्या जिह्यात गद्दारांची अवलाद शिल्लक ठेवू नका
एका बाजूला गद्दार आहे. राजकीय जन्म शिवसेनेने दिला त्याच आईच्या कुशीवर वार करणारा हा गद्दार आहे, अशी टीका ठाकरेंनी प्रतापराव जाधव यांच्यावर केली. पुढे बोलताना ते म्हणाले, दुसरीकडे अन्यायावर वार करणारा नरेंद्र खेडेकर आहे. ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या रूपाने तेज दिले. त्याच मातेचा हा जिल्हा आहे. त्याच जिह्यात भगव्याशी गद्दारी करणारी औलाद शिल्लक ठेवता येणार नाही, त्याला गाडावच लागेल, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.
मग महाराष्ट्रात का येताय?
निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेवर गरळ ओकायला येणारे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कधी आले नाहीत. आता मतांची भीक मागायला वारंवार येताहेत. उद्धव ठाकरे संपला असे म्हणताय ना, मग महाराष्ट्रात का येताय, उद्धव ठाकरे आज कडाडले.
शेवटचा रामराम करायला मोदी फिरताहेत
शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ एक संकटे कोसळत होती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा मोदी चौकशीही करायला आले नाहीत. तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा अशी त्यांची अवस्था आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आता मोदी सगळीकडे फिरत आहेत. त्यांना सर्वांना शेवटचा रामराम करायचा आहे. ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा रामराम घ्यावा,’ अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली.
मोदी कधी बांधावर आले का? – मुकुल वासनिक
काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक म्हणाले की, शेतकऱ्यांवर ज्या- ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली त्या- त्या वेळी मोदी बांधावर आले होते का? दररोज शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांनी कधी शेतकऱ्यांचे अश्रू पुसले नाही ही वस्तुस्थिती आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List