मासेमारीसाठी होतोय कीटकनाशकांचा वापर
सीना—कोळगाव धरणातील मासेमारीसाठी मच्छीमारांकडून शेतपिकांवर फवारण्यात येणाऱया सायपरमेथ्रीन, क्लोरोपायरीफोस या विषारी कीटकनाशकांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे मासे खाणाऱयांच्या आरोग्यासह जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत तक्रार करूनही प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या या बोटेचेपे धोरणाबद्दल नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मासेमारीचा कुठलाही ठेका नसताना काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून सीना- कोळगाव धरणात दहशत करत मासेमारी करण्यात येत आहे. अवघ्या तासाभरात शेकडो क्विंटल मासे भेटत असल्याने मच्छीमारांकडून मासेमारीसाठी विषारी औषधांचा वापर होत आहे. या बेकायदेशीर मासेमारीला प्रशासनाकडून चाप लावण्याऐवजी वारंवार तक्रारी करूनही बघ्याची भूमिका घेण्यात येत आहे.
सध्या सीना-कोळगाव धरणात अत्यल्प पाणीसाठा असून, नदीपात्रापुरते पाणी शिल्लक आहे. मासेमारी कीटकनाशकांचा उपयोग केल्यामुळे माशांना भोवळ येते व ते जाळ्यात अलगद अडकतात. या औषधांचा डोस जास्त झाल्यानंतर मासे मृत्युमुखीदेखील पडत आहेत. औषधामुळे मेलेले मासे विक्रीसाठी गावागावात पाठविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
सीना नदीवरून विहिरीत पाणी सोडले जात असल्याने विहिरीतील माशांना देखील याचा धोका होत असून, कीटकनाशक वापरलेले नदीतील पाणी विहिरीत सोडल्याने हिवरे येथील ब्रह्मदेव फरतडे यांच्या विहिरीतील शेकडो मासे मृत्युमुखी पडले आहेत.
माशांबरोबरच नदीतील इतर जीवसृष्टीला या औषधांचा धोका होत आहे. या पाण्यावर हरीण, रानडुक्कर, पशू-पक्षी शेतकऱयांची जनावरे पाणी पितात. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल केला जात आहे.
आमच्या विहिरीत पाणी आणण्यासाठी नदीवरून पाईपलाईन आहे. मात्र, नदीत मासेमारीसाठी कीटकनाशकांचा वापर होत असल्याने या पाण्याने आमच्या विहिरीतील मासेदेखील मृत्युमुखी पडले आहेत. पाण्याला उग्र वास येत असल्यामुळे जनावरेदेखील पाणी पित नाहीत. या विषारी पाण्यामुळे जनावरे दगावल्यास याला जबाबदार कोण, याकडे प्रशासन लक्ष देईल काय?
– ब्रह्मदेव फरतडे,
शेतकरी, हिवरे नागोबाचे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List