अबब! मुंबईत तब्बल 46 लाख वाहने
मुंबईतील गाडय़ांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली आहे. या आठवडय़ात मुंबईत वाहनांच्या संख्येने 46 लाखांचा टप्पा गाठला आहे. वाहनांच्या घनतेबद्दल सांगायचे तर प्रति किलोमीटर रस्त्यावर 2300 गाडय़ा आहेत. मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येवर वेळीच आळा घातला नाही तर अवघे शहर ब्लॉक होईल, अशी भीती वाहतूक तज्ञांनी व्यक्त केली.
मागील पाच वर्षांत मुंबईतील वाहनांची घनता पाच पटीने वाढली आहे. 2019 साली प्रति किलोमीटर 1840 गाडय़ा मुंबईत होत्या, तर त्याआधी 2014 मध्ये प्रति किलोमीटर वाहनांची संख्या 1150 होती. या सर्वांचा परिणाम म्हणजे मुंबईत वाहनांची संख्या वाढल्याने कामानिमित्त कार घेऊन बाहेर पडणाऱयांना ट्रफिक जाम, प्रदूषण, संताप यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबईच्या खालोखाल चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, दिल्ली येथे गाडय़ांची घनता जास्त आहे.
वाहनांच्या खरेदीवर हवा लगाम
तज्ञांच्या मते, सिंगापूर आणि लंडन यांसारख्या शहरांत वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणतानाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन दिले जात आहे. चीनमध्ये शांघाई आणि बीजिंग शहरे ‘जॅम’ होऊ नयेत म्हणून गाडय़ांच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. माद्रिद आणि न्यूयॉर्क येथेही कमी गाडय़ा रस्त्यावर धावतील यादृष्टीने प्रयत्न केले जातात. अॅमस्टरडम आणि ओस्लो ही शहरे कार फ्री होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
…तर शहर ब्लॉक होईल
जेव्हा 40 टक्के मुंबईकर गाडय़ा रस्त्यांवर आणतील तेव्हा सर्व शहर तासाभरासाठी ब्लॉक होईल, असा धोक्याचा इशारा तज्ञ विवेक पै यांनी दिला. लोकांनी नवीन गाडय़ा खरेदी करण्यापेक्षा जुन्या, वापरलेल्या गाडय़ा खरेदी केल्या पाहिजेत. अन्य राज्यांतून/ शहरांतूनही अनेक जण गाडय़ा आणतात. त्यामुळे अडचणीत भर पडते, असे त्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List