सगळ्या यंत्रणा केवळ विरोधकांच्या मागे, अंबादास दानवे यांची सरकारवर टीका
बॉलिवूड अभिनेता Salman Khan याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केला. या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. घटनेला बारा तासाहून अधिक काळ उलटून गेला तरी अद्याप हल्लेखोरांची काहीच माहिती मिळालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यावरून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.
”दिवसाढवळ्या सलमान खानच्या घराबाहेर गोळ्या झाडल्या जातात आणि घटना घडून अनेक तास होतात. तरीही आरोपी सापडत नाहीत. सगळ्या यंत्रणा केवळ विरोधकांच्या मागे लावता तसे सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना पकडण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यंत्रणा लावणार का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पहाटे पाचच्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून याची माहिती मिळताच पोलिसांच्या गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेतली. सलमानला याआधीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळालेल्या असून गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खान याला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने याआधी अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानला मारणे हेच आमचे लक्ष्य असल्याचे त्याने एका मुलाखतीत जाहीरपणे सांगितले होते. गेल्या वर्षी सलमान खानला एक धमकीचा मेल आला होता. सलमानचा जवळच्या प्रशांत गुजाळकर याला रोहित गर्गकडून हा धमकीचा मेल आला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List