भाजपचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’; जनता आता भाजपच्या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही!
सत्तेत असताना 10 वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले, जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी व जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले आणि पुन्हा याच घटकांना फसवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ असून जनता आता भाजपच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नागपुर येथे पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने मागील 10 वर्ष फक्त अदानीसाठी काम केले, हे सरकारच अदानी सरकार होते पण जाहीरनाम्यात अदानीचा हिस्सा असायला हवा होता ते मात्र दिसत नाही. समान नागरी कायद्याचे आश्वासन तर मागील निवडणुकीतही दिले होते मग आतापर्यंत भाजपने त्याची अंमलबजावणी का केली नाही, त्यांना कोणी रोखले होते का?
वन नेशन, वन इलेक्शन म्हणजे पुन्हा निवडणुकाच घेणार नाही असे आहे. 2014 व 2019 मध्ये भाजपने जे सांगितले तेच मुद्दे आजच्या जाहीरनाम्यात आहेत. जनता आता भाजपच्या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला घरी बसवण्याचा संकल्प जनतेने केला आहे, असा टोला पटोले यांनी लगावला.
गडकरींनी माफी मागावी
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व कायमचे भावी पंतप्रधान नितीन गडकरी यांनी चंद्रपूरातील सभेत खालची पातळी गाठली. आमचा उमेदवार शिलाजित खाल्लेला पैलवान आहे, असे विधान करून गडकरींनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. शिलाजित कशासाठी खातात हे नितीन गडकरींनी सांगावे. महिलांचा अपमान करणाऱ्या नितीन गडकरी यांनी माफी मागितली पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List