शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग; कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतूककोंडी तातडीने सोडवा, नगरविकासचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश
कल्याण-शिळ रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूककोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तातडीने नियोजन करून योग्य उपाययोजना कराव्यात यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आवाज उठवला होता. शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतूककोंडीबाबत उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी आवाज उठवला होता. याबाबत त्यांनी नगरविकास मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला होता. या पत्रात त्यांनी वाहतूककोंडीची समस्या मांडली होती. राहुल भगत यांच्या निवेदनाची दखल घेऊन नगरविकासच्या कक्ष अधिकारी नेहा आंगणे यांनी कोकण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी कल्याण-शिळ मार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्याबाबत स्पष्ट अभिप्राय व शिफारशींसह आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या उपाययोजना करा
वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नगरविकास मंत्रालयाने कल्याण-शिळ रस्त्याची प्रत्यक्ष पडताळणी करून नवीन पर्यायी मार्ग आखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राहुल भगत यांनी केली आहे. तसेच काटई-ऐरोली उन्नत मार्ग आणि केडीएमसीचा रिंग रूट प्रकल्प युद्धपातळीवर कार्यान्वित करावा असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List