फलटण प्रकरणात माजी खासदाराला CM कडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच! – हर्षवर्धन सपकाळ
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ज्या संवेदना व्यक्त केल्या आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनात असल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच आहेत. हा राजकारणाचा विषय नसून महिला सुरक्षेचा विषय आहे, त्याअनुषंगाने राहुल गांधी यांचे ट्विट मार्गदर्शक म्हणून पहावे असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींच्या ट्विटवर केलेली टीका राजधर्माला शोभा देत नाही, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या अत्यंत गंभीर व संवेदनशील आहे. राहुल गांधी यांनी त्याच अनुषंगाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे कुचकामी गृहमंत्री ठरेल आहेत, त्यांच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर दुसरीकडे फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात कोयता गँग, आका, खोक्या ही देणगी त्यांनी राज्याला दिली आहे. कायदा सुव्यवस्था वेशीवर टांगली गेली आहे त्यामुळे राज्याला किमान पूर्ण वेळ गृहमंत्री असणे गरजेचे आहे पण फडणवीस यांना गडचिरोलीतील खाणीत जास्त रस असून पंतप्रधानपदावर नजर असल्याने कायदा सुव्यवस्था, विकास व महिला सुरक्षा याच्याशी त्यांचा काहीही संबंध राहिलेला नाही., अशी टीका सपकाळ यांनी केली.
भाजपा ही वॉशिंग मशीन आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेकांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते पण त्यांनाच पक्षात व सत्तेत सहभागी करून पवित्र करुन टाकले आहे. फलटणच्या घटनेत माजी खासदाराचा उल्लेख होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लिन चिट देणे म्हणजे त्यांचा या कटात सहभाग असल्याचा पुरावाच असल्याचेही ते म्हणाले.
महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड
महायुती सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले असल्याने त्यांच्याकडे योजनांसाठी पैसाच नाही. पंतप्रधान आवास योजनेसाठी पैसे नाहीत, लाडकी बहिण योजनेसाठी पैसे देऊ शकत नाही. पंतप्रधान महाराष्ट्रात येणार म्हणून शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, हे पॅकेज फसवे आहे हे आम्ही आधीच सांगितले होते आता या पॅकेजचा फोलपणा समोर येत आहे. हे पॅकेज एक थोतांड आहे. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावीत तसेच कर्जमाफी करावी. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे, असेही सपकाळ म्हणाले.
ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणी राहुल गांधी यांचा आरोप
जैन बोर्डींग व्यवहाराप्रकरणी कारवाई करा
जैन बोर्डींगची जमीन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ गिळंकृत करू पहात होते पण हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने मुरलीधर मोहोळ यांना वाचवण्यासाठी तो व्यवहार रद्द करावा लागला आहे परंतु हा व्यवहार रद्द करून चालणार नाही तर या व्यवहारात जे लोक सहभागी होते त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. जमीन हडप करण्याच्या कटात कोण कोण होते याचा पर्दाफाश झाला पाहजे, असेही सपकाळ म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List