India Pakistan War च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील मंदिरंही ‘अलर्ट मोड’वर
हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरानंतर आता शिर्डीच्या साईबाबा मंदिरही ‘अलर्ट मोड’वर आले आहे.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दररोज हजारो भाविक भेट देत असतात. मात्र या पार्श्वभूमीवर, मंदिरात वाहिली जाणारी फुलं, हार आणि अन्य पूजासामग्रीची स्कॅनिंग करण्याची प्रक्रिया आता मंदीरात सुरू करण्यात आली आहे. कोणताही संशयास्पद पदार्थ घेऊन मंदिर परिसरात शिरू नये, यासाठी विशेष मशीनद्वारे या वस्तूंची तपासणी केली जात आहे.तसेच मंदिराच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये भाविकांना मंदिरात प्रवेश करताना इलेक्ट्रिकल उपकरणे घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून भाविकांची गर्दी व हालचालींवर 24 तास बारकाईने नजर ठेवली जात आहे. त्याचबरोर सुरक्षा रक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास त्त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबईतील यंत्रणा देखील ॲलर्ट मोडवर आली आहे. मुंबईतील संवेदनशील भागातील पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, नागरी संरक्षण दल, एनसीसी, एनएसएस आदी सर्व यंत्रणांची पूर्वतयारी करून घेण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तारापूर, बीएआरसी, तसेच महत्वाची धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, लोकांची गर्दी असलेल्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोबतच पेट्रोलिंग देखील वाढवण्यात आली आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नाशिकच्या पंचवटीतील रामकुंड, कपालेश्वर मंदिर तसेच काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये मॉकड्रील करण्यात आले आहे. आपत्ती काळात पर्यटन स्थळी पर्यटक अडकल्यास या आपत्तीजन्य परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे? याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात आले आहे. पोलीस अग्निशमन विभाग, नागरी संरक्षण दलाचे जवान आणि आरोग्य विभागाने यावेळी प्रात्यक्षिक केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List