मोदी खोटं बोलताहेत! संजय राऊत यांचा हल्ला
‘‘अडचणीत आलेला व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी सर्वांत जास्त खोटं बोलतो, असं चाणक्याने सांगितलं आहे. अडचणीत असल्यामुळे नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत,’’ असा हल्लाबोल शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला. ‘‘मोदींनी खिडकी उघडू देत किंवा दरवाजा उघडला तरी काही फरक पडत नाही. आम्ही त्यांच्या दारात उभे राहणार नाही. कारण हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे,’’ असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ठणकावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्याचा संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला. ‘‘मोदींची ही वक्तव्ये पाहता, ते निवडणूक हरत आहेत, असं दिसतंय. त्यांना माहीत आहे की, या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळत नाही, म्हणून ते फटी, दरवाजे, खिडक्या उघडायच्या मागे लागले आहेत. मोदींनी खिडकी उघडू देत पिंवा दरवाजा उघडला तरी आम्ही त्यांच्या दारात उभे राहणार नाही. कारण महाराष्ट्रात अजून स्वाभिमान शिल्लक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही तो स्वाभिमान टिकवून ठेवला आहे,’’ असे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.
‘‘शिवसेना ही सर्टिफाईड वाघ आहे. आमची निशाणीच वाघ आहे. त्यामुळे विश्वजीत कदम सांगलीचे वाघ असतील, तर त्यांनी चंद्रहार पाटील यांना विजयी करून वाघ असल्याचे सिद्ध करून दाखवावे. 4 जून रोजी आम्ही कदम यांचा सत्कार करू,’’ असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
मोदींनीच अडचणी निर्माण केल्या
‘‘महाराष्ट्र आणि शिवसेनेत मोदींनीच अडचणी निर्माण केल्या. त्यांना आता प्रेमाचा हा जो काही पान्हा पुन्हा फुटला आहे, तो जर खरंच फुटला असता, तर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडली नसती. शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण त्या बेइमान माणसाला दिले नसते. त्यामुळे मोदींचं हे जे काही प्रेम उफाळून आलंय, ते खोटं आहे,’’ असे संजय राऊत यांनी ठणकावले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List