हिंजवडी आयटी पार्कमध्ये अवजड वाहने ऐटीत, सहा कोटींचा दंड वसूल
<<< मंगेश हाडके >>>
गेल्या अकरा महिन्यांत हिंजवडी परिसरात रस्ते अपघातांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवेशबंदीचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांच्या 59 हजार 196 चालकांवर पोलिसांनी विविध गुन्हे दाखल केले असून, 6 कोटी 67 लाख 60 हजार रुपये दंडही वसूल केला आहे. मात्र, तरीही परिसरात दररोज होणारी वाहतूककोंडी…. गेल्या काही दिवसांत अवजड वाहनांमुळे गेलेले बळी… बंदीच्या वेळेतही जड अवजड वाहनांची ये-जा… काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे यावर आता पोलिसांनी नोटिशीचा उतारा काढला आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये चार दिवसांत अवजड वाहनांच्या अपघातात दोन तरुणींना जीव गमवावा लागला. हिंजवडी आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांत अवजड वाहनांच्या अपघातांचे प्रकार
हिंजवडी परिसरात 1 जानेवारी ते 18 नोव्हेंबर 2025 या अकरा महिन्यांच्या कालावधीत 58 रस्ते अपघात झाले. त्यात 15 जणांना जीव गमवावा लागला आहे. प्रवेश बंदीच्या वेळेत 53 हजार 218 जड-अवजड वाहनचालकांनी हिंजवडी हद्दीत प्रवेश केल्याने त्यांच्यावर हिंजवडी वाहतूक विभागामार्फत गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून 5 कोटी 94 लाख 53 हजार 650 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी दिली.
सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये अवजड वाहनांबद्दल दहशत निर्माण झाली आहे. या सर्व अपघातांमागे अवजड वाहनांचा बेशिस्तपणा हे एकच कारण ठळकपणे समोर आले आहे. आयटी पार्क परिसरात 133 अधिक कंपन्या आहेत. त्यामुळे दररोज तीन ते चार लाख लोकांची ये-जा असते. वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, रस्ते अरुंदच आहेत. रस्त्यांची दुरवस्था आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे अभियंते हिंजवडीसह वाकड, रावेत, पुनावळे, ताथवडे परिसरात वास्तव्यास प्राधान्य देतात. त्यामुळे या भागात रहिवासीकरण वाढत आहे. मोठमोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. बांधकामासाठी लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्या रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांची संख्याही अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी आता नामी उतारा काढला आहे. प्रवेश बंदीच्या वेळेत अवजड वाहने येऊ नयेत, यासाठी परिसरातील आरएमसी प्रकल्पचालक, बांधकाम साईट यांना पोलिसांकडून नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.
“हिंजवडी परिसरात सकाळी आठ ते बारा आणि दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. 21 नोव्हेंबर रोजी मारूंजी येथे झालेला अपघात हा दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडला आहे. प्रवेशबंदीच्या वेळेत अवजड वाहने येऊ नयेत, यासाठी परिसरातील आरएमसी प्रकल्पचालक, सर्व बांधकाम साईट यांना पोलिसांकडून नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत”, असे पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List