SIR साठी आणखी किती लोकांचे बळी घेणार? निवडणूक आयोगावर ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला संताप
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका बूथ लेव्हल अधिकाऱ्याच्या (BLO) आत्महत्येने राजकीय वातावरण तापले आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कठोर शब्दांत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. नादियातील कृष्णनगर येथील शिक्षिका असलेल्या रिंकू तरफदार या बीएलओने गुरुवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येसाठी निवडणूक आयोगाला (ECI) जबाबदार धरले आहे. याचबद्दल X वर एक पोस्ट करता ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, SIR (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) प्रक्रियेच्या दबावामुळे त्या मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या.
ममता बॅनर्जी यांनी यावर दुख व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “SIR साठी आणखी किती लोकांचे बळी घेणार? किती शवे पाहायची? हे आता खरंच चिंताजनक झाले आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “SIR साठी आणखी किती लोक मरण्यासाठी तयार राहतील?” त्यांनी SIR प्रक्रिया ताबडतोब थांबवावी, अशी मागणी केली आहे.
टीएमसी पक्षाने एका निवेदनात याप्रकरणी म्हटलं आहे की, नादिया येथील बीएलओ रिंकू तरफदार मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या आणि त्यांना असह्य वाटत होतं. पक्षाच्या निवेदनात म्हटले आहे की, “निवडणूक आयोगाची गुंतागुंतीची डिजिटल प्रक्रिया, वेळापत्रके, शिक्षेची भीती आणि कर्मचाऱ्यांवर लादलेली चोवीस तास देखरेख ही एक प्रकारची मानसिक छळवणूक आहे आणि ती पूर्णपणे अस्वीकार्य आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List