मराठा, धनगर समाजाला हिस्सा देऊ! आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांनी वाढवणार
‘भाजपचे नेते कधी संविधान बदलण्याबद्दल बोलतात, तर कधी आरक्षण संपवून टाकणार, असे सांगतात. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यानंतर देशात आरक्षणाची असलेली 50 टक्क्यांची मर्यादा वाढवू. यामध्ये मराठा, धनगर समाजांनादेखील त्यांच्या आरक्षणाचा हिस्सा देऊ. तसेच जातनिहाय जनगणना करून त्या-त्या जातीच्या संख्येनुसार सर्वांना संधी मिळेल,’ अशी मोठी घोषणा काँग्रेस नेते-खासदार राहुल गांधी यांनी आज केली. ‘पंतप्रधान मोदींनी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा वाढवू, असे कुठेही जाहीर करून दाखवावे,’ असे आव्हानही राहुल गांधी यांनी दिले.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी यांची आज पुण्यात प्रचंड सभा झाली. राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली.
‘एकीकडे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी संविधान, लोकशाहीला वाचवण्यासाठी लढत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस संविधानाला संपवू इच्छित आहेत. हे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. या संविधानात महात्मा फुले यांचे विचार आहेत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी हिंदुस्थानच्या जनतेला सोबत घेऊन वर्षानुवर्षे लढाई करून देशवासीयांना संविधान दिले. याच संविधानामुळे देशातील गरीब, होतकरू, शेतकरी, मागास, दलित, अल्पसंख्याक, आदिवासींना अधिकार मिळतात. या संविधानाशिवाय काहीच नाही. जे काही जनतेच्या हातात आहे, ते सर्व देशाच्या फक्त 20 ते 25 लोकांच्या हाती जाईल असे राहुल गाधी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List