गोदावरी नदीचे पात्र पडले कोरडे; वाळवंटाचे स्वरूप
गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील कोपरगाव येथील गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरातील नदीकाठच्या, गावांमधील शेतकरी हैराण झालेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न उभा राहिला आहे.
प्रचंड होत असलेला वाळू उपसा, नदीपात्रात ठिकठिकाणी टाकण्यात आलेले बेसुमार विजेचे आकडे, नदीपात्रात खोदलेल्या विहिरी व त्यावर चालवणाऱ्या मोटारी व बेसुमार पाण्याचा उपसा यामुळे व निसर्गाचा बिघडलेला समतोल तसेच गतवर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस यामुळे दक्षिणगंगा गोदावरी नदीचे पात्र पूर्णतः कोरडे ठाक पडले आहे.दुष्काळाची दाहकता त्यावरून दिसून येत आहे.
तालुक्यातील संवत्सर गावाजवळील हे गोदावरीचे नदीपात्र असून ते पूर्णतः कोरडे ठाक पडले आहे. जनावरांच्या पिण्याच्य पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून नदीपात्रात एक थेंबही पाण्याचा दिसत नाही.
गोदावरी नदी पात्राला वाळवंटाचे स्वरूप… दुष्काळ अन् वाळू उपशामुळे भीषण परिस्थिती….
तालुक्याच्या गोदावरी नदीच्या पट्ट्यातून, परिसरातून बारा महिने वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र यावर्षी मार्च महिन्यातच कोरडेठाक पडले गेले. दुष्काळामुळे यावर्षी जानेवारी महिन्यातच बोअर, विहिरी आटल्याने परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा जानवत आहे. त्यामुळे दक्षिणगंगा गोदावरी पात्राला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. पुर्वी वाळूत पाणी साठून रहायचे, परंतू बेसुमार वाळू उपशामुळे आता गोदावरी नदीचे वाळवंट झाल आहे.
या जीवनदाय म्हणून ओळख असलेल्यागो गोदावरीमुळे परिसराला वैभव प्राप्त झाले होते. परंतु मागील दहा- वीस वर्षात नदी पात्रातून प्रचंड बेसुमार वाळू उपसा झाला. पूर्वी तीन- तीन.. पाच पाच.. वर्षे सलग दुष्काळ पडला तरी नदीतील वाळूत पाणीसाठा रहायचा.
दशक्रिया विधीला अडचण
दक्षिणगंगा गोदावरीचे पात्र पवित्र मानले जात असल्याने जिल्ह्यातील बहुतांश गावातील नागरिक मयत नातेवाईकांचा दशक्रिया विधी कोपरगाव, पुणतांबा परिसरात गोदावरी नदी पात्रामध्ये करतात. मात्र गोदावरी कोरडी पडल्याने दशक्रिया विधी करण्यास अनेक अडचणी येत आहेत.
बंधाऱ्यांनी गाठला तळ
पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी झाल्याने गोदावरी पात्र कोरडे पडले आहे. समन्यायी पाणी वाटपाचा बसलेला कोलदांडा शेतकऱ्याच्या उरावर बसला आहे, यावर्षी नाशिकच्या धरणांमधून जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले होते. लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या बंधाऱ्यांनी तळ गाठला आहे. याचा परिणाम या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर झाला आहे. सध्या परिस्थित नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्राणी ही पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे.
यामुळे परिसरातील विहीरी, विंधन विहिरी यांना वर्षभर पाणीच पाणी असायचे. बेसुमार वाळू उपशामुळे गोदावरी पात्रात वाळूच शिल्लक राहीलेली नाही. बोअर आटून गेले. गोदावरी पात्र कोपरगाव तालुक्याच्या परिसरातील भागासाठी वरदान ठरलेले आहे. यामुळे गोदावरी ही परिसरातील गावांची जगतजननी समजली जाते. शेतकरी, शेतमजूर, व्यावसायीक तसेच इतर क्षेत्रातील बहुतांशी नागरिक याच नदीवर अवलंबून आहेत. नदीला पाणी नसले की अनेक अडचणी येतात. पाणी, चारा, रोजगार याबाबतीत संघर्ष करावा लागतो.
कोपरगाव शहरानजीक छोट्या पुलाजवळ साचलेल्या डबकातील पाण्यावर हिरवा तरंग आला असून त्यामुळे त्यातील जलचर प्राणी मासे मरून पडल्याचे दिसून येते. शहराचे सर्व ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात सोडले असल्याने हे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने जनावरे त्या पाण्याला तोंडही लावीत नाहीत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List