मोदींनी पेडर रोड आणि शाह यांनी बोरिवलीत भाड्याने घर घेतलं, संजय राऊत यांचा टोला
मी अस ऐकलं आहे की नरेंद्रे मोदी यांनी पेडर रोड आणि अमित शहा यांनी बोरिवली मध्ये भाड्याने घर घेतलंय. इथेच त्यांना रहायचं आहे ना, दुसरं काम काय आहे त्यांना ? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी पंतप्रधानांना टोला हाणला. त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही, काश्मीर खोऱ्यात जायला वेळ नाही असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्शअवभूमीवर पंतप्रधामन मोदींचे महाराष्ट्रात सतत दौरे होत असून येत्या १२ आणि १७ तारखेला त्यांचा मुंबई दौरा आहे. त्याच मुद्यावरून टीका करताना संजय राऊत यांनी टोला लागवला. तुम्ही इथे कितीही खुंट्या ठोकल्यात तरी महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव तुम्हाला करता येणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.
बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई
लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून सगळे महत्त्वाचे मतदार संघ महत्त्वाचे नेते लढत आहेत. मोदी, शहा सगळे इथे भाषण करून गेले आहेत. या सर्व मतदारसंघात बारामतीत सर्वांचं लक्ष होतं. महाराष्ट्राची लढाई ही बारामतीत होते आहे की काय ? शरद पवारांचा पराभव करायचा काहीही करून हे मोदी शहा यांनी ठरवलं आहे. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे. आम्ही (गुजरातच्या) व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन, पैशाच्या ताकदीवर तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला, हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. पण ते शक्य नाही असे म्हणत बारामती आम्ही (महाविकास आघाडी) जिंकूच असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने सुप्रियाताई सुळे जिंकतील, असेही ते म्हणाले.
सुनेत्रा पवार यांना बळीचा बकरा केला
मला सुनेत्रा पवार यांची दया येते, कारण त्यांच्या पतीने, अजित पवार यांनी त्यांचा बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे यांचं काम सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्रातील भाजपचे अनेक विद्यमान खासदार आता पुन्हा लोकसभेत दिसणार नाही, हे चित्र स्पष्ट आहे असं म्हणत भाजचा पराभव निश्चित आहे, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.
१० वर्षं टोप्या लावल्या तेवढ्या पुरे, मोदींना टोला
नारायण राणे यांच्याबाबतीत पराभवाचा चौकार बसेल. आम्ही या आधी ३ वेळा त्यांचा पराभव केलाय. कोकणातही आणि मुंबईतही हरवलं. आता लोकसभेच्या मोठ्या मैदानात उतरले आहेत. या कुस्तीतसुद्ध त्यांना चीतपट केलं जाईल, विनायक राऊत हे पुन्हा लोकसभेत जातील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी येऊ देत किंवा अमित शहा, महाराष्ट्राची जनता आता त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. १० वर्षं टोप्या लावल्या तेवढ्या पुरे, आता महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List