दिल्लीत पुन्हा धडकणार शेतकऱयांचे वादळ; मोदी सरकारला सळो की पळो करून सोडणार
शेतमालाला किमान हमीभाव आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱयांचे वादळ आज पुन्हा दिल्लीत धडकले. पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानातील हजारो शेतकरी शंभू बॉर्डरवर जमले. सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा उद्या 100 वा दिवस आहे. त्यामुळे हजारो शेतकऱयांनी मोर्चे काढले. आज सकाळपासूनच शेतकऱयांनी आंदोलनस्थळी जमायला सुरुवात केली. शेतकऱयांची एकच गर्जना दिल्लीत घुमणार असून आता बळीराजाच मोदी सरकारला सळो की पळो करून सोडणार आहे.
शेतकऱयांनी एक मोठा मंडप उभारला असून अनेक छोटे तंबूही दिसत आहेत. ताडपत्री, पंखे आणि रेफ्रिजरेटर असलेल्या ट्रक्टर आणि ट्रॉलीचे घरात रूपांतर करण्यात आले आहे. पारा तब्बल 45 च्या आसपास असून हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. चटके देणाऱया या कडाक्याच्या उन्हात आणि अंगातून घामाच्या धारा निघत असतानाही शेतकरी शंभू बॉर्डरवर जमले आहेत. सुमारे 40 हजार शेतकरी शंभू बॉर्डरवर जमतील असा शेतकरी नेत्यांचा अंदाज आहे. दरम्यान, पंजाब पोलिसांनीही वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी जागोजागी चौक्या उभारल्या आहेत.
n मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात करण्यात आलेल्या 100 दिवसांच्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 22 शेतकऱयांना विशेष श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यात 22 वर्षीय शुभकरन सिंग याचाही समावेश आहे.
या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक
शेतमालाला कायदेशीर हमी हवी आहे असे हरयाणातील भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष अमरजीत सिंह मोहरी आणि जाट नेते अशोक बुलारा म्हणाले. तसेच डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, शेतकरी आणि शेतमजुरांची सरसकट कर्जमाफी, 10 हजार रुपये प्रति महिना सामाजिक सुरक्षा, लखीमपूर खेरीतील शेतकऱयांना न्याय आणि सरकारी खर्चाने पीक विमा योजना हवी अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List