स्थानिकच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची राज्यस्तरीय समन्वय समिती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत समन्वय रहावा यासाठी महाविकास आघाडीने राज्यस्तरीय समन्वय समिती नेमण्याचा निर्णय आज घेतला. या समितीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी होणार असून त्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीत मतांचे विभाजन न होता उमेदवारीबाबत काही तिढा असेल तर तो सोडवण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती महत्त्वाची भूमिका बजावेल, असे यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले. प्रत्येक पक्षाने स्थानिक स्तरावर निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार दिलेले आहेत. पण उमेदवारीबाबत काही मतभेद असतील तर ते दूर करण्याचे काम ही समिती करेल, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा-खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट)चे अध्यक्ष सचिन खरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे हेसुद्धा उपस्थित होते.
आता टप्प्याटप्प्याने बैठका होणार -अनिल परब
आजची बैठक नगरपालिका व नगरपरिषदांसाठी मर्यादित होती. त्याचे सर्वाधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. त्यामुळे तिथे निर्णय होतील आणि एखादी समस्या निर्माण झालीच तर समन्वयक निर्णय घेतील. आता टप्प्याटप्प्याने महाविकास आघाडीच्या बैठका होणार आहेत, असे शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब यांनी सांगितले.
निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा प्रयत्न करू – हर्षवर्धन सपकाळ
मागच्या दोन निवडणुका आम्ही एकत्रितपणे लढलो. आघाडी म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाशी झुंज देत आहोत. त्यामुळे आघाडीत समन्वय असणे गरजेचे आहे. पुढे येणाऱ्या संभाव्य अडचणी सोडवण्यासाठी संवाद खुला असावा यासाठी विभागनिहाय, जिल्हानिहाय व राज्य पातळीवर समन्वय कायम ठेवण्यासाठी समन्वय समिती नेमली जाणार आहे, असे यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. मित्रपक्ष या नात्याने निवडणुकीत सोबत जाण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी निवडणुकीतील आघाडीबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. निवडणूक आयोग एबी फॉर्ममध्येही गोंधळ घालत आहे. दादरा नगर हवेलीमध्ये काँग्रेसचे शंभर टक्के एबी फॉर्म रिजेक्ट करण्यात आले. त्यामुळे स्थानिकच्या निवडणुकीत काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
19 नोव्हेंबरला पुन्हा बैठक
राज्यस्तरावर प्रत्येक पक्षाचा एक नेता या समन्वय समितीमध्ये असेल. समितीकडून चर्चेनंतर काही निर्णय झाला नाही तर अंतिम निर्णय राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा असे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले आहे. 19 नोव्हेंबरला पुन्हा बैठक होणार असून त्यात प्रचाराच्या नियोजनाबाबत चर्चा होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List